अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रथम क्रमांकाचे कॉलेज मिळाल्यानंतर प्रवेश न झाल्यास आणि अचानक प्रवेश रद्द झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना पुढील तीनऐवजी आता एकाच फेरीत सहभागी होता येणार नाही.
असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी पुढील तीन फेरीपर्यंत प्रवेशासाठी संबंधित विद्यार्थ्यांना प्रतिबंध करण्यात येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई (महानगर क्षेत्र), अमरावती, नाशिक, नागपूर या महापालिका क्षेत्रांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश राबविण्यात येते. सध्या या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी प्रक्रिया आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पर्यायातील प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास, घेतलेला प्रवेश रद्द केल्यास किंवा महाविद्यालयाने प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांला पुढील तीन प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याला बंदी होती. या विद्यार्थ्यांला चौथ्या विशेष फेरीमध्ये सहभागी व्हावे लागत होते. मात्र, या नियमात बदल करण्यात आला असून, संबंधित विद्यार्थ्यांला पुढील एका फेरीतच सहभागी होता येणार नाही. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये त्याला सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणात फायदा होणार असून त्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठीचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.
महाविद्यालयांची संख्या वाढण्याची शक्यता
राज्य सरकारच्या २८ मार्च २०१६ आणि २७ जानेवारी २०१७ रोजीच्या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्र, पुणे महापालिका क्षेत्रातील वगळण्यात आलेल्या गावांचा इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात यावा, असाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इनहाउस कोटय़ांतर्गत प्रवेश कोणत्याही टप्प्यावर करण्याची व जागा प्रत्यार्पित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असेही निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.