राज्यात कोरोनाची तिसरी लाट नव्या वर्षात धडकली आणि महिन्याअखेरीस ओसरली देखील आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनची (omicron) रुग्ण संख्या देखील आता आटोक्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात राज्य सरकारने नाईट कर्फ्यु आणि कडक निर्बंध लागू केले होते. पण,आता परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली होती. एवढंच नाहीतर ओमायक्रॉनचा समूह संसर्ग देखील सुरू झाला होता. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली. राज्यात सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण आज पासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी जे निर्बंध लागू करण्यात आले होते, ते आता 1 फेब्रुवारी पासून हटवण्यात आले आहे.
राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार मात्र 50 टक्के क्षमतेची परवानगी. लग्नासाठी 200 व्यक्तींची मर्यादा केली गेली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत बंदिस्त जागेत किंवा खुल्या जागेत उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या २०० व्यक्तींपुरती मर्यादित असेल. मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे, सलून, थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार. स्विमिंग पूल, स्पा, जिम सुरू राहतील. मुंबई लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत.