कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (29 जुलै) कोव्हिड टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली.
राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून 11 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी टोपेंनी निर्बंध कायम राहणाऱ्या जिल्ह्यांची नावं देखील जाहीर केली आहेत.
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आलेला नाही अशा 11 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. पण त्यात काही प्रमाणात शिथिलता देता येऊ शकते का? याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचं राजेश टोपे म्हणाले. या 11 जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील या जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम?
पश्चिम महाराष्ट्र- पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर
कोकण- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर
मराठवाडा- बीड
उत्तर महाराष्ट्र- अहमदनगर
हे निर्बंध होणार शिथिल :
शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुकानं सुरू आणि फक्त रविवारी बंद.
खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी 50 टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू.
शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकणार.
राज्यातील संसर्गाचं प्रमाण घटलं?
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरससंदर्भात आकडेवारीबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने 28 जुलै रोजी एक अहवाल प्रकाशित केला आहे.यामध्ये राज्यातील कोरोना संसर्गात लक्षणीय घट झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 27 जुलै रोजी 82 हजार 082 सक्रिय रुग्ण होते. गेल्या 15 जूनपासून सक्रिय रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. सद्यस्थितीत पुण्यात 15 हजार 344, ठाण्यात 9 हजार 510, कोल्हापुरात 8 हजार 749, सांगलीत 8 हजार 348 तर सातारा येथे 7 हजार 271 सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, या सर्व चर्चेदरम्यान, मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच राहिला आहे. कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पण, या सगळ्याचे नियोजन करण्याचा भाग हा रेल्वेच्या अखत्यारीत असणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.