येत्या सोमवार पासून म्हणजेच 7 जून पासून महाराष्ट्र अनलॉक होणार आहे, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र, या प्रक्रियेमध्ये जे पाच टप्पे शहराच्या विभागणीनुसार करण्यात आले आहेत, यामध्ये येणाऱ्या शहरांमध्ये अडकलेल्या लोकांना किंवा प्रवास करू इच्छिणार्या लोकांना ई पास मिळणार की नाही, किंवा ई पास मिळण्याची प्रक्रिया काय असणार, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. याचेच निरसन आज आपण करणार आहोत.
पहिला गट
ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा 5 टक्के आणि ऑक्सिजन बेड 25 टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.
दुसरा गट
पॉझिटिव्हिटी दर हा 5 टक्के आणि 25 ते 40 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.
तिसरा गट
पॉझिटिव्हिटी दर हा 5 ते 10 टक्के किंवा 40 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.
चौथा गट
पॉझिटिव्हिटी दर हा 10 ते 20 टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.
पाचवा गट
पॉझिटिव्हिटी दर हा 20 टक्क्यांपेक्षा अधिक किंवा 75 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.
या पाच गटांमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे विभागले गेले आहेत. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार अनलॉकची प्रक्रिया आणि ई-पास मिळण्याचे नियम घातले जाणार आहेत.
ई-पास साठीचे नियम!
एक ते चार गटातील जिल्ह्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तिथे ई-पास ची गरज नाही. मात्र या चार गटांमध्ये प्रवास करणारी व्यक्ती ही जर पाचव्या गटातून येणारी असेल, म्हणजेच ज्या ठिकाणी संसर्ग जास्त आहे, अशा जिल्ह्यातून प्रवास करणारी असेल तर त्या व्यक्तीला नियमांसहित ई-पास काढावा लागणार आहे. त्याचबरोबर, या जिल्ह्यातील लोकांना जर संसर्ग जास्त असलेल्या जिल्ह्यात म्हणजे पाचव्या गटातील जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर, ई-पास लागणार आहे.
पाचवा गटातील जिल्ह्यासाठी मात्र प्रवासाची मुभा देखील देण्यात आलेली नाही. या गटातील जिल्ह्यातील लोकांना e-pass हा सक्तीचा केलेला आहे. अत्यावश्यक आणि आरोग्याशी संबंधित कारणांसाठीच हे लोक प्रवास करू शकतात. ते देखील पास असेल तरच!