राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने अक्षरशा हाहाकार माजवला होता. मात्र सध्या नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. तसेच राज्याचा रिकव्हरी रेटही देखील वाढत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून अनलाॅकच्या उपाययोजना देखील सुरु झाल्या आहे.
राज्यातील अनलाॅकबाबत महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात आता 5 टप्प्यांमध्ये अनलाॅक होणार असल्याची माहिती त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
काय म्हणाले मंत्री विजय वडेट्टीवार? :
सध्याच्या घडीला राज्य हे पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार असून, या पाच टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल.
यामध्ये हॉटेल्स, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होणार आहे. जिल्हा आणि महानगर पालिका धरून राज्य सरकारकडून एकूण 43 भाग पाडले आहेत. या अनलॉकच्या सर्व नियमांची सुरुवात उद्यापासून केली जाणार आहे’, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पहिले 18 जिल्हे कोणते?
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ हे 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे.
अनलॉकचे एकूण पाच टप्पे कोणते?
पहिला टप्पा – पूर्णपणे अनलॉक
दुसरा टप्पा – मर्यादित स्वरुपात अनलॉक
तिसरा टप्पा – निर्बंधासह अनलॉक
चौथा टप्पा – निर्बंध कायम
पाचवा टप्पा – रेड झोन, पूर्णपणे लॉकडाऊन
दरम्यान, पूर्णतः अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना 100 टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला देखील परवानगी असेल. तर सिनेमांच्या किंवा मालिकांच्या शूटिंगला देखील परवानगी असेल. तर लग्नसोहळ्यांना देखील 100 लोकांच्या उपस्थितीची परवानगी असेल’, असे मंत्री वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.