भारतामध्ये कोरोना महामारीचा अक्षरशः कहर सुरु आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेक लोक संक्रमित होत आहे. तर मागील काही दिवसापासून देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या रोज 2-3 लाखांच्या घरात गेली आहे. तर दुसरीकडे देशाचा मृत्यू दर देखील वाढत आहे. जगभरामध्ये भारताच्या या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
एवढे असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच प्रत्येकाने मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे या त्रिसुत्री नियमांचे पालन करण्याचे देखील आवाहन केले जात आहे. मात्र नागरिकांकडून याचे पालन होताना दिसत नाही.
कोरोनाच्या महामारीच्या पहिल्या लाटेवेळी प्रत्येकाला “दो गज की दुरी, मास्क है जरुरी!” हे अक्षरशः तोंडपाठ झाले आहे. तरीही अनेकांना आजही मास्क कुठे घालावा? तो कसा असावा? मास्क घालण्याची योग्य पद्धत कोणती हेही माहीत नाही.
नागरिक मास्कचा वापर करतात परंतु तो योग्य प्रकारे करत नसल्याने कोरोना संक्रमित होण्याचा धोका अधिक असल्याचे सांगतले जाते. कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्वाचे शस्त्र असेल तर ते आहे मास्क. पण 50 टक्के लोक याच शस्त्राचा योग्यपद्धतीने वापर करता दिसत नाहीत.
एका रिपोर्टनुसार सांगण्यात आले आहे कि :
देशात 64 टक्के लोक हे चेहरा झाकतात पण त्याच्या नाकावर मास्क नसते. तर 20 टक्के लोकांचा मास्क हा हनुवटीवर असतो. तर उर्वरित 2 टक्के लोक हे मास्क हनुवटी खाली घशावर लावतात. तर केवळ आणि केवळ 14 टक्के लोक असे आहेत ते नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल अशा योग्यप्रकारे मास्क लावतात. जर तुम्ही हि अशीच चुका करत असं तर सुधारा मास्क लावताना योग्य ती काळजी घ्या, योग्य पद्धतीने चेहऱ्यावर मास्क लावा. असे न केल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.