राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू; राज्य सरकारच्या आधीच्या नियमात महत्वपूर्ण बदल
राज्यात मागील काही दिवसांपासून डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळं राज्यावरील कोरोनाचा धोका आणखी वाढला असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता राज्य सरकारनं काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर थोड्या प्रमाणात ओसरत असल्याने लावण्यात आलेले कडक निर्बंध 5 टप्प्यांमध्ये शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पहायला मिळत आहेत. त्यातच डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, आज जारी करण्यात आलेल्या आदेशांनुसार जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नव्या नियमावलीत नेमके काय?
▪️ पात्र नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे, यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे
▪️ टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे
▪️ हवेमधून पसरू शकणाऱ्या करोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे
▪️ मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे
▪️ कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे
▪️ गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे
▪️ कंटेनमेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्या. जेणेकरून ज्या भागात करोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील
Levels of restrictions for safe Maharashtra pic.twitter.com/FOAKTSrI9A
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 25, 2021
दरम्यान, नवीन नियमावली नुसार तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकानं 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.