कोरोना पार्श्वभूमीवर टोकियोमधील 1 वर्षांपासून लांबणीवर पडलेली ऑलम्पिक स्पर्धा येत्या 23 जुलै पासून सुरू होत आहे. कोरोनाचा वाढत चाललेला कहर आणि कोरोनविषयक नियम याचा मेळ साधत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी किती भारतीय खेळाडू पात्र झाले आहेत आणि कसे असणार कोरोना प्रतिबंधक नियम ते जाणून घेऊया.
कोरोनामुळे काही नियम कडक करण्यात आले आहेत ते कसे हे पाहू:
ऑलिम्पिक संघटनेने कोरोना साथीचा विचार करता स्पर्धेसाठी एक 33 पानी नियमावली बनवली आहे.
या नियमावलीत पहिला नियम म्हणजे खेळाडूंना जपान मध्ये क्वारंटाईन नसले तरी, दर 4 दिवसाने कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे. दर चौथ्या दिवशी खेळाडूंना कोरोना चाचणी करून घ्यावी लागेल. एखादा खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला स्पर्धेत भाग घेऊ दिला जाणार नाही. चाचणी किती वेळा होईल, याचे नियम बदलूही शकतात.
मात्र, असे असले तरी प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडू कोणाच्याही संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. रेस्टॉरंट, बार, पर्यटन स्थळे इत्यादींना भेटी देता येणार नाहीत. स्वयंसेवक, प्रेक्षक देखील सामने पाहू शकणार नाहीत. त्यामुळे यावेळी ऑलम्पिक सर्वांसाठी टीव्हीवर असेल.
जाणून घ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू
तिरंदाजी
तरुणदीप राय, अतानू दास, प्रवीण जाधव, दीपिका कुमारी हे तिरंदाज भारताचं प्रतिनिधित्व करतील.
अॅथलेटिक्स
युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंह पदकाचे दावेदार आहेत. या दोघांसह के.टी. इरफान, संदीप कुमार, राहुल रोहिल्ला, अविनाश साबळे, मुरली श्री शंकर, नीरज चोपडा, शिवपाल सिंह, कमलप्रीत कौर, भावना जाट, प्रियंका गोस्वामी इत्यादी
बॉक्सिंग
मेरी कोमसह विकास किशन, लोवलिना बोरगोहैन, आशिष कुमार, पूजा राणी, सिमरनजीत कौर, सतीश कुमार, अमित पंघल, मनीष कौशिक हे आपापल्या वजनी गटातून सहभागी होतील.
तलवारबाजी
तलवारबाजीत ऑलिम्पिक स्तरावर पहिल्यांदा भारताचं प्रतिनिधित्व पाहायला मिळणार आहे. भवानी देवीने मार्चमध्ये हंगेरी इथे झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत टोकियाचं तिकीट पक्कं केलं.
हॉकी
भारताच्या पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. नोव्हेंबर 2019मध्ये प्रत्येकी 16सदस्यीय संघांनी टोकियावारी पक्की केली.
नेमबाजी
टोकियो स्पर्धेत अंजुम मोदगिल, अपूर्वी चंडेला, दिव्यांश सिंह पनवर, दीपक कुमार, तेजस्विनी सावंत, संजीव राजपूत, ऐश्वर्या सिंह तोमर, मनू भाकेर, यशस्विनी सिंह देसवाल, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, राही सरनोबत, चिंकी यादव, अंगद वीर सिंह बाजवा, मैराज अहमद खान नेमबाजी करतील.
टेबल टेनिस
अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमलने चौथ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. शरथच्या बरोबरीने जी.साथियन, सुतीर्थ मुखर्जी आणि मनिका बात्रा टोकियात भारताचं प्रतिनिधित्व करतील. शरथ आणि मनिका मिक्स डबल्स प्रकारातही खेळतील.
कुस्ती
आतापर्यंत चार कुस्तीगीरांनी टोकियाचं तिकीट पक्कं केलं आहे. विनेश फोगट, बजरंग पुनिया, रविकुमार दहिया, दीपक पुनिया हे चौघं टोकियासाठी कसून तयारी करत आहेत.
बॅडमिंटन
पी.व्ही.सिंधू, साई प्रणिथ चिराग शेट्टी, सात्विकसैराज रणकीरेड्डी क्रमवारीनुसार टोकियोला खेळणार आहेत.
अश्वशर्यती
दोन दशकांनंतर अश्वशर्यतींमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व असणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता फवाद मिर्झाने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला.