सरकारचा मोठा निर्णय : कोरोना काळात ‘या’ गोष्टी नसल्या तरी देखील सरकारी योजनांचा लाभ घेता येणार
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गेल्या काही दिवसांत देशातील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता अनेकांनी आता धास्ती घेतली आहे. सध्याच्या काळात कोरोनारुपी संकट दूर करण्यासाठी असलेली आरोग्य यंत्रणा पुरेपूर कोलमडून गेल्याचं दिसून आलं.
याशिवाय देशभरात अनेक रुग्णालयात तर अपुऱ्या वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर्स आणि ऑक्सिजन अभावी रुग्णांना जीव गमवावा लागला असल्याचे चित्र समोर आहे. मागील काही दिवसं पासून जरी रुग्णसंख्या घटत असली तरी देखील कोरोना साखळी तोडण्याचं मोठं आव्हान प्रत्येक राज्यच्या प्रशासनासमोर आहे. तर एवढेच नाही तर अनेक राज्यांनी कोरोना फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय देखील घेतला आहे.
मात्र या कठीण काळात उद्योगधंदे ठप्प असल्याने अनेक कुटुंबांचे खूप हाल होत असून, यासाठी आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सरकारचा निर्णय नेमका काय?
कोरोना महामारीच्या संकटात देण्यात येणाऱ्या लाभासाठी यापुढे आधारकार्ड अनिवार्य नसणार आहे. यापुढे तुमच्याकडे आधारकार्ड नसेल तर घाबरण्याचं कोणतेही कारण नाही. सर्वसामान्यांना कोणत्याही लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही असं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा लोकांनाही सेवा आणि सरकारी योजनांचा फायदा घेता येणार आहे.
दरम्यान, रेशन कार्ड व आधार कार्डशी लिंक नसल्याचं कारण पुढे अनेक रेशन कार्ड रद्द करण्यात आली होती. यासाठी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. सरकारच्या निर्णयामुळे गरीबांना उपासमारीच्या संकटाला सामोरं जाव लागत आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.