कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात अनेक दिवस कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता राज्यातील नागरिकांना या निर्बंधातून काहीशी सुटका मिळणार असून आज सोमवारपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना महाराष्ट्र अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे करताना जर रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
मंगलकार्यालयांना सूट : खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.
खाजगी कार्यालय 24 तास सुरू राहणार : खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल. खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील.
थिएटर्स, धारमक स्थळे बंदच राहणार : सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे.
लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास : लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.