गेल्या वर्षभराहुन अधिक काळ जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात तसेच जगात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून दिवसेंदिवस बाधितांच्या आकड्यात वाढ होताना दिसतेय. सोमवारी देशात 2 लाख 73 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तर गेल्या 24 तासात आज 2 लाख 56 हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळ्याचे समोर आले आहे.
या कालावधीत 1 हजार 761 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1 लाख 54 हजार 761 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक असून देशात कोरोना स्थिती अगदी गंभीर होत असल्याचे केंद्रीय आरोग्या विभागाच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे.
तर दुसरीकडे राज्यात कडक संचारबंदी लागू करूनही सात दिवसांत अडीच लखांहून अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई झाली आहे. राज्यात मागील सहा दिवसांत तीन लाख 79 हजार 54 रुग्ण आढळले असून दोन हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण, ऑक्सिजनसह अन्य औषधांचा तुटवडा, या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध विभागांना दिलेल्या सवलती बंद करून 30 एप्रिलपूर्वी आठ दिवसांचा कडक लॉकडाउन लागू शकतो असे सांगतले जात आहे.
राज्यातील व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागली असून दुसरीकडे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचाही तुटवडा जाणवत आहे. सध्या राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखांपर्यंत गेली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, रायगड, वसई विरार, नाशिक, नगर, जळगाव, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, परभणी, लातूर, बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ मोठी आहे.
राज्यातील वाढलेल्या मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढविली आहे. मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी “डेथ ऑडिट’ कमिटींची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्याकडून अहवाल मागविला जात आहे.
तत्पूर्वी, राज्यात कडक संचारबंदी करूनही बहुतेक नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याची स्थिती पोलिस कारवाईतून समोर येत आहे. त्यामुळे आणखी कडक पाऊल उचलण्याच्या अनुषंगाने सोमवारी आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील सांगतले आहे.
कडक लॉकडाउनची मुख्य कारणे नेमके कोणते?…
▪️ दिवसेंदिवस वाढतेय मध्यम व तीव्र, अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या
▪️ शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये खाटांसाठी वशिलेबाजी; सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी गुंतल्या खाटा
▪️ लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसही पुरेशा प्रमाणात मिळेना; रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनचा जाणवू लागला तुटवडा
▪️ कडक संचारबंदी असतानाही बेशिस्तीचे दर्शन; दररोज रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय
▪️ आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला; मागील सहा दिवसांत पावणेचार लाख रुग्ण वाढले तर दोन हजार 298 जणांचा मृत्यू