ब्रेकिंग..! राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द
सध्या राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, याआधी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेवरून पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता.
कोरोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहाता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे.
मात्र, आता बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला असून येत्या काही तासांत त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
विद्यार्थी कसे होणार पास?
“दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाईल. यासंदर्भात काही तज्ज्ञांशी चर्चा करून, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.”, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
Given the worsening situation of the #Covid-19 pandemic, the Maharashtra government has now decided to CANCEL the state board exams for class 10th. The health & safety of our students and teachers is our topmost priority.#exams #ssc #hsc pic.twitter.com/C8xCY3VVdX
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 20, 2021
दरम्यान, राज्यातील इतर बोर्डांकडून देखील अशा प्रकारचे निर्णय आत्तापर्यंत घेण्यात आले आहेत. याआधी ICSE आणि CBSE या दोन बोर्डांनी देखील त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांचं काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. त्यानंतर अखेर राज्य सरकारनं देखील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करावं, यावर तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, असं देखील राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.