बॉलीवूड ही भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडणारी गोष्ट आहे. बॉलीवूडचे चित्रपट, त्यातील अभिनेते, अभिनेत्री आणि इतर कलाकार, त्यांच्या सौंदर्याचे, राहणीमानाचे, कलागुणांचे आकर्षण हे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत असल्याचे सर्वत्र आढळते. त्यामुळे सिनेमाला स्वप्न म्हटले जाते. सिनेमामुळे व्यक्ती स्वप्न पाहायला शिकतो आणि हि स्वप्न बॉलीवूड आपल्याला देत असते. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सरस कलाकार आहेत. प्रत्येक कलाकाराचा चाहतावर्ग वेगळा आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी प्रत्येक कलाकार झटत असतो. संघर्ष करत असतो. अथक परिश्रम आणि संघर्षानंतर त्याला बॉलीवूडमध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त होते.
मात्र याची दुसरी बाजू म्हणजे स्टार किड्स होय. अलीकडील काळात अभिनेते किंवा कलाकार किंवा बॉलिवूडमधील प्रस्थापित कलाकारांच्या मुला-मुलींना फारसा संघर्ष करून बॉलिवूडमध्ये स्थान मिळण्याची आवश्यकता नसते. त्यांना आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईमुळे बॉलिवूडमध्ये लगेच संधी मिळते. मात्र याला काही कलाकार अपवाद आहेत. जसे की शाहिद कपूर, अजय देवगन, संजय दत्त आणि सर्वात हँडसम ऋतिक रोशन होय.
या सर्वांचे वाडवडील फिल्म इंडस्ट्रीत असून देखील या कलाकारांनी स्वतःच्या मेहनतीने कष्टाने स्वतःचे स्थान बॉलिवुडमध्ये निर्माण केले आहे. यापैकी ऋतिक रोशन हा जगातील सर्वात हँडसम पुरुषांमध्येदेखील गणला जातो. 47 व्या वर्षात देखील त्याने स्वतःला असे असे ठेवले आहे की एखाद्या तरुणाला सुद्धा तो लाजवेल. याव्यतिरिक्त त्याचा अभिनय देखील अनेकांना भुरळ पाडतो. आज त्याच्या त्याच्याविषयी या लेखात आपण खास माहिती पाहणार आहोत.
ऋतिक रोशन हा अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता राकेश रोशन यांचा मुलगा आहे हे आपण जाणतोच. मात्र वडील फिल्म अभिनेते, नामांकित दिग्दर्शक असून देखील हृतिक रोशनला बॉलिवूडमध्ये सहजासहजी स्थान मिळाले नव्हते. यासाठी त्याला फार संघर्ष करावा लागला. अगदी वडील करत असलेल्या चित्रपटांच्या सेटवर ऋतिकने झाडू देखील मारण्याचे काम केले आहे हे सांगितले तर कोणाला खरे वाटणार नाही. मात्र त्याने केलेला हा संघर्ष त्याला आज सर्वोच्च उंचीवर घेऊन गेला आहे.
ऋतिकची पहिली फिल्म ‘कहोना प्यार है’ या फिल्मची निर्मिती त्याचे वडील राकेश रोशन आणि दिग्दर्शनसुद्धा राकेश रोशन यांनी केले होते. मात्र ऋतिकला या फिल्ममध्ये मुख्य भूमिका साकारायला वडिलांची फार मनधरणी करावी लागली. यात फिल्मच्या सेटवर झाडू मारण्याचे काम सुद्धा करावे लागले. यातूनच तो घडत गेला आणि त्याला ‘कहोना प्यार है’ मध्ये मुख्य भूमिका साकारायला मिळाली. त्यापूर्वीदेखील बालपणापासून ऋतिक वडील राकेश रोशन यांच्या सेटवर जात असे. सेटवर छोटी-मोठी कामे करणे, अभिनेत्यांना चहा, पाणी नेऊन देणे इत्यादी कामं ऋतिक करत असे. हि कामं करत करत तो वडिलांच्या हाताखाली असिस्टंट डायरेक्टर म्हणून देखील काम करायला लागला आणि चित्रपटातील बारकावे शिकायला लागला.
वडील राकेश रोशन यांची अशी इच्छा होती कि, ऋतिकने चित्रपटातील सर्व डिपार्टमेन्टची कामे शिकावीत. तसेच त्यातील बारकावे शिकून घ्यावेत आणि ऋतिक ते शिकला देखील. याचाच फायदा त्याला पुढे करियरमध्ये अष्टपैलूत्व प्राप्त करून घेण्यासाठी झाला. अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांचा ‘करण अर्जुन’ हा चित्रपट आपल्यापैकी सर्वांना माहित आहे. हा चित्रपट देखील ऋतिकचे वडील राकेश रोशन यांनी बनवला होता. या चित्रपटामध्येदेखील ऋतिक सहाय्यक दिग्दर्शक अर्थात असिस्टंट डिरेक्टरचे काम करत होता. मात्र या चित्रपटात असिस्टंटचे काम करत असताना राकेश यांनी ऋतिकला चांगलेच पिटाळून घेतले. त्याला खूप काम करायला लावले. त्याला बिलकुल आराम करू दिला नाही.
इतके सर्व झाले तरी ऋतिक हिम्मत हरला नाही आणि काम करताच राहिला. वडील राकेश रोशन यांनी एका मुलाखती दरम्यान या गोष्टीचा खुलासा केला होता, की तेथील काम सोपे नसते हे सांगण्यासाठी मी ऋतिकला असे काम सांगत असे. मात्र त्यावर तो खरा उतरला. पुढे मुलाखतीत राकेश रोशन म्हणाले की ‘ऋतिकला या सर्व गोष्टी मी यामुळे करायला सांगितल्या की स्वतः मी आणि माझे वडील म्हणजे ऋतिकचे आजोबा यांनी कोण कोणत्या परिस्थितीत झेलून हे स्थान मिळवले आहे हे ऋतिकला समजावे. अभिनय करण्यापेक्षा सेटवर काय काम चालते आणि कॅमेऱ्याच्या मागे, पडद्याच्या मागे काय हालचाली असतात याचा अनुभव ऋतिकला यावा म्हणून हे सर्व कामे त्याला सांगण्यात आले.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिसते तसे नसते, हे हृतिकला समजावे किंवा अभिनय करणे हा आरामाचे काम आहे असे त्याला वाटू नये यासाठी त्याला चित्रपटातील सर्व विभागांचे काम वडिलांकडून देण्यात आले. आणि त्यानी ते केले देखील. अशाप्रकारे वडील राकेश रोशन आणि आजोबा ओमप्रकाश यांच्या हाताखाली ऋतिक घडत गेला आणि एक सफल अभिनेता बनला. ऋतिकने लहानपणी बालकलाकाराची भूमिका देखील साकारली होती. ऋतिकचे आजोबा ओम प्रकाश यांनी ‘आशा’ या चित्रपटामध्ये ऋतिकला एक रोल दिला होता. याबद्दल त्याला त्यावेळी शंभर रुपये मानधन देण्यात आले होते. हीच ऋतिकची पहिली कमाई होती.
आज घडीला ऋतिक सुपरस्टार बनला आहे. जगातील सर्वात हँडसम पुरुषांमध्ये त्याची गणती होते. त्याचा अभिनय देखील वाखाणला जातो. त्यांचे चित्रपट देखील करोडोंच्या घरात चालतात. यामागे त्याचे वडील आणि आजोबांनी घेतलेली मेहनत आहे. ऋतिक वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील चर्चेत आला होता. ऋतिक त्याची पत्नी सुझानने त्याच्याशी घेतलेला घटस्फोट किंवा त्याचे अभिनेत्री कंगना राणावत सोबत असलेले प्रेमसंबंध ह्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी त्यातून तो सहीसलामत बाहेर आला असून सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत आहे.