15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन… आपण काही दिवसातच 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करू! कोणताही राष्ट्रीय सण हा राष्ट्रगीता शिवाय अपुराच! आपला राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय सण, या काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा मान प्रत्येक भारतीयाने राखायला हवा.
आपण ज्या देशात राहतो जो देश आपल्याला सांभाळतो, सर्वार्थाने स्वयंपूर्ण बनवतो, त्या देशासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचे काहीच क्षण देशवासीय म्हणून आपल्या वाट्याला येतात. या क्षणांमध्ये राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय सण याविषयी आदर भावना व्यक्त करणे हे त्यापैकी काही असतात.
रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये जनगणमन ही कविता लिहिली. या कवितेचे पहिल्यांदा वाचनही 27 डिसेंबर 1911 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाच्या एका कार्यक्रमात झाले. त्यानंतर, बराच काळ लोटला आणि 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.
24 जानेवारी 1950 रोजी हीच कविता आपले राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली गेली. शब्द आणि संगीत टागोरांनी आंध्रप्रदेश येथील मदनापल्ली येथे तयार केले.
राष्ट्रगीत आणि नियम
राष्ट्र गीत गाण्यासाठी केवळ 52 सेकंदाचा वेळ लागतो. हा वेळ आपण नक्कीच आपल्या देशासाठी अभिमानास्पद असलेल्या गोष्टी करण्याला देऊ शकतो. दिवसभरात बराच वेळ आपण उगाच वाया घालवतो. निदान या कारणाने वेळ सार्थकी तरी लागतो. राष्ट्रगीताचे काही नियम आहेत जे देशाचे नागरिक म्हणून पाळणे आपले कर्तव्य आहे. यामध्ये राष्ट्रगीत तुमच्या कानी पडल्यावर लगेच स्तब्ध आणि शांत उभे राहून कुठलीही हालचाल न करता राष्ट्रगीत म्हणणे हे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्यांवर, फौजदारीचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सिनेमा हॉल किंवा सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींसमोर जर राष्ट्रगीत सुरू झाले तर उभे राहणे बंधनकारक आहे.
संयुक्त राष्ट्र संघात घुमला राष्ट्रगीताचा आवाज
15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्याच्या पूर्वसंध्येला (14 ऑगस्टच्या मध्य रात्री) संयुक्त राष्ट्र संघात मध्ये भारतीय राष्ट्रगीत म्हणून भारतीय प्रतिनिधींनी तिथे या गीताची माहिती दिली. त्यावेळी प्रत्येक राष्ट्राला आणि त्याच्या प्रतिनिधींनाही राष्ट्रगीत प्रचंड आवडले. त्याचे कौतुकही झाले. बरोबर तीन वर्षाने हेच गीत राष्ट्रगीत म्हणून अधिकृतरीत्या भारताने स्वीकारले!