कोरोनामुळे अनेकांना अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या. रोजगार उपलब्ध होणे देखील अनेक जणांना कठीण झाले आहे. मोठ्या कंपन्यांना कर्मचारी कपात करण्याची वेळ आल्याने अनेकांना रोजगाराच्या शोधात भटकावे लागत आहे.
अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच क्षेत्रात आजही प्रगतीची संधी उपलब्ध आहे. हे असे क्षेत्र आहेत जिथे ग्रोथ नेहमीच होती. आजही हे क्षेत्र प्रगतच आहेत. कोणते आहेत हे क्षेत्र? जिथे इतर ठिकाणी कर्मचारी कपात होत असताना इथे मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार वाढत होते.
आर्थिक वर्ष 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये कंपन्यांचं आर्थिक उत्पन्न वाढू लागलं आहे असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अर्थव्यवस्थेबाबत रिझर्व्ह बँकेनं आपल्या अहवालात म्हंटलं आहे की चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीतही कंपन्यांच्या नफ्यात वाढ होताना दिसत आहे.
RBI च्या अहवालानुसार 16 क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं आहे आणि पगारामध्ये वार्षिक वाढ केली आहे.
वेतन बिलात सर्वाधिक वाढ कापड क्षेत्रात (37.7 टक्के) आणि सर्वात कमी वाढ वाहतूक (1.8 टक्के) क्षेत्रात दिसून आली आहे असंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
या क्षेत्रांची भरारी आयटी, कम्युनिकेशन्स, पॉवर, फार्मा आणि एफएमसीजी ही पाचक्षेत्रं आहेत ज्यांचं वेतन बिल आर्थिक वर्ष 2021 च्या सर्व तिमाहीत कधीच कमी झालं नाही. आयटी क्षेत्रातील वेतन बिल सर्व तिमाही दरम्यान वाढतच गेलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, त्यात 16.7 टक्के वाढ झाली. कोरोना महामारी दरम्यान, फार्मा क्षेत्रानंही चांगला नफा कमावला आहे.
या क्षेत्रांची वाढ मंदावली
RBI च्या अहवालानुसार, ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सर्वात कमी 1.8 टक्के वाढ झाली. तसंच कोरोना महामारीचा सर्वात वाईट परिणाम पर्यटन क्षेत्रावर झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या चार तिमाहीत या क्षेत्राच्या वेतन बिलामध्ये घट दिसून आली. मात्र या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यात 4.3 टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच हळुहलौ सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे. तसंच नोकरी आणि पगारवाढही होताना दिसत आहे.