देशातभरात कोरोना महामारीने उद्रेक केला असतानाच दुसरीकडे कोरोना रोगाच्या साथीसोबतच आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराची साथ देशात सुरू झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात एकाच खळबळ माजली असून देशात प्रत्येक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशी जन्य आजाराने मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत.
या आजाराने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच या आजाराला वेळीच रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन लाख इंजेक्शन्सची मदत मागितली आहे. राज्य सरकार त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे, पण ती इंजेक्शन्स 31 मे नंतरच उपलब्ध होणार आहेत. तोपर्यंत पुढचे दहा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत.’ अशी गंभीर चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज व्यक्त केली.
या आजाराने राज्यात आत्तापर्यंत 90 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, 500 रुग्णांनी आजारावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान तरी देखील म्युकरमायकोसिसचे राज्यातील विविध रुग्णालयांत 850 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.