उद्यापासून ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम सेवा होणार बंद? काय आहे कारण आणि तथ्य जाणून घ्या!
ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात आपण आपला कंटेंट टाकतो. या सेवा उद्यापासून बंद होणार असे सांगितल्यास तुम्हाला धक्का बसेल! मात्र, असे होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.
कारण, या कंपन्यांना त्यांच्या माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या कंटेंटवर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकारी नेमण्याच्या सूचना केंद्र सरकारने 25 फेब्रुवारी रोजी दिल्या होत्या.
त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत 26 मे रोजी संपत आहे. दरम्यान, या कंपन्यांनी अद्याप या सूचनांबाबत अंमलबजावणी केलेली नाही.
त्यामुळे येत्या दोन दिवसांत कदाचित या कंपन्यांच्या सेवा बंदही केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडिया हा खूप चांगल्या कामांसाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म असला, तरी अफवा, चुकीची माहिती पसरवणं, भावना भडकवणं, द्वेष पसरवणं आदींसाठीही समाजकंटकांकडून त्याचा उपयोग केला जातो.
सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याचा परिणाम कमी कालावधीमध्ये जास्त भौगोलिक क्षेत्रावर होत असतो. याच्या कंटेंट वर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारी आणि कंपलायन्स आधिकारी यांची नेमणूक प्रत्येक सोशल मीडिया कंपनीने करावी, असे सरकारने 25 फेब्रुवारी रोजी सांगितले होते.
कम्प्लायन्स अधिकारी भारतीय असला पाहिजे, तसंच तो भारतात राहणारा असला पाहिजे, असंही सरकारने नियमावलीत सांगितलं होतं.
लोकांना सोशल मीडियावर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कोणाकडे तक्रार करावी, यासाठी देखील या कंपन्यांकडे कोणता पर्याय आहे याचा खुलासा ना ट्विटरने, फेसबुक ने, नाही इतर सोशल मीडिया कंपनीने दिला आहे. त्यामुळे ही मुदत संपल्यानंतर सरकार कारवाई करणार हे नक्की आहे.
मात्र, दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिलेला असताना देखील या कंपन्यांनी याची अंमलबजावणी केलेली दिसत नाही. त्यामुळे, उद्यापासून या सर्व सेवांवर सरकार बंदी घालणार की आणखी कठोर नियम करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!