कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जास्त भयानक आहे. म्युटंट झालेला हा विषाणू ज्येष्ठांसह तरुणांसाठीही जास्त घातक ठरत असून अनेक जणांना रुग्णालयात भरती व्हावं लागतंय.
कोरोना काळात अनेकांना आपल्या कुटुंबियांची आरोग्य जोपासना व्यवस्थित व्हावी, यासाठी आरोग्य विमा हवाच असे वाटू लागले आहे. तुम्ही आजारी असाल तेव्हा खर्चाचा विचार करून दुखणे अंगावर काढण्याचे हे दिवस नाहीत. तेव्हा आरोग्य विमा हवाच मात्र, तो घेताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे ठरते.
1. आरोग्यविमा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा हवा:
जेव्हा तुम्ही फॅमिली प्लॅन मधून आरोग्य विमा घेता तेव्हा, काही मर्यादा येतात. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा विमा असेल तर त्याचा फायदा सुद्धा त्या व्यक्तीच्या वयानुसार आणि असणाऱ्या आरोग्य अडचणी नुसार मिळतो.
2. वेटिंग पिरियड कसा असावा:
कोणतीही विमा कंपनी तुम्हाला आरोग्य विमा देताना लगेच क्लेम देत नाही. 15-90 दिवस पॉलिसी घेऊन झाल्यावर जर तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला क्लेम मिळू शकतो. जिथे वेटिंग पिरियड कमी असेल तिथून आरोग्य विमा घ्या!
3. को-पेमेंट नको!:
अनेकदा लवकर क्लेम मिळावा म्हणून लोक को पेमेंट पद्धत स्वीकारून विमा योजना घेतात. मात्र, यात विमा कंपनी काही टक्के आणि विमाधारक काही टक्के हॉस्पिटल चे बिल भरतात. यात, काही काळाने तुमचे नुकसान असते.
4. ऍडमिट करण्यासाठी:
व्यक्तीला 24 तास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर, त्याचे बिल तुम्हाला कंपनीकडून मिळू शकते. तुम्ही जी खोली केली आहे त्याचे चार्जेस एकूण विमा रकमेच्या 1% असावेत. याहून अधिक खर्च करत बसलात तर अतिरिक्त बिल तुमच्या माथी येऊ शकते.
काही इतर महत्वाच्या गोष्टी – –
कोणत्या प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स निवडायला हवा? तुम्ही कोणता इन्शुरन्स निवडावा हेपूर्णपणे तुमच्या आरोग्यावर अवलंबून आहे. यासह, तुम्ही राहत असलेलं शहर आणि तिथल्या आसपासच्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी लागणाऱ्या खर्चावर अवलंबून आहे.
साथीच्या आजारात कुटुंबासाठी कोणती विमा योजना निवडावी?
कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा आरोग्य विमा काढण्यास प्राधान्य द्या. हा विमा जरी कौटुंबिक योजनेचा भाग असला तरी कुटुंबातील प्रत्येकासाठी त्यांची विम्याची स्वातंत्र्य रक्कम असायला हवी. एखादी महामारी अथवा साथीचा रोग आल्यास कुटुंबातील बऱ्याच सदस्यांना रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं अशावेळी फॅमिली प्लॅन्समधील मर्यादांमुळे कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो.